अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना दहा हजार कोटींची मदत जाहीर
मुंबई /प्रतिनिधी- राज्यातील अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या आणि पूरग्रस्तांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयाबाबत माहिती देताना राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, जिरायतीसाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये तर बागायतीसाठी प्रतिहेक्टर १५ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे जिरायतीसाठी केंद्राकडून ६,८०० रुपयांच्या मदतीचे निकष असले तरी राज्यानं यासाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.